स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्रातील नामवंत कवी प्राध्यापक संदीप जगताप यांना पुणे येथील महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीचा ” महात्मा फुले- सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील अतिशय निवडक शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो . या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतात. केवळ चार भिंतीच्या आत शिकवणारा शिक्षक नव्हे तर जो समाजाला शाळा मानतो. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाचा उपयोग करून सर्वसामान्य , गोरगरीब तळागाळातल्या माणसासाठी रस्त्यावर संघर्ष करतो. अशा महाराष्ट्रातील गुणवंत लोकांवर लक्ष ठेवून कुठलाही प्रस्ताव न मागवता या पुरस्काराची निवड केली जाते. या निवडक लोकांमध्ये संदीप जगताप यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात सोमवार 28 नोव्हेंबर ला शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ,चित्रलेखा चे संपादक ज्ञानेश महाराव , माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीचे अध्यक्ष नामवंत इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे , प्रा .सोमनाथ गोडसे यांनी दिली.
संदीप जगताप यांचा शिक्षक म्हणून प्रवास हा पंधरा वर्षाचा आहे. त्यातील 14 वर्ष तासिका तत्त्वावर अल्पवेतनावर काम केले. 2008 पासून तासिका तत्वावर काम करताना आर्थिक टंचाई घरात असताना सुद्धा संदीप जगताप यांनी शेतकऱ्यांच्या दुःख वेदनेची कविता लिहिली. शेतकऱ्यांचे जगणे ठसठशीत पणे कवितेतून उभं केलं.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला. आपल्याला वेतन नाही घरामध्ये आर्थिक अडचण आहे.याचा फारसा गवगवा न करता स्वतःच्या गरजा कमी करून समाजातल्या लढ्यांसाठी घरातील पैशाचा वापर केला. 2017 च्या ऐतिहासिक शेतकरी संपामध्ये संदीप जगताप आणि त्यांची कविता अग्रभागी राहिली. त्यांच्या कवितेने 2017 चा ऐतिहासिक शेतकरी संप मोठा केला. शेतकऱ्यांची एकजूट घडवून आणण्यात संदीप जगताप यांचे कल्पक नेतृत्व आणि त्यांची ताकतीची कविता आघाडीवर होती.यानंतर त्यांनी राजू शेट्टी सारख्या प्रामाणिक नेत्यासोबत काम करण्याचे व शेतकरी चळवळीत सक्रिय होण्याचे ठरवले. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदापासून पासून तर आज राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत प्रवास केला आहे.प्रभावी, वैचारिक , मुद्देसूद व प्रसंगी आक्रमक वक्तृत्वाने ते लोकप्रिय शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रात अल्पवधीत प्रसिद्ध झाले.
विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ही ते शाळेत वावरत आहे.शिक्षक असताना आपल्यातील संवेदनशील माणूस व कार्यकर्ता त्यांनी जिवंत ठेवला.वर्गातील गरीब मुलांची फी भरणे, गरीब विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्याला आर्थिक मदत मिळवून देणे,पूरग्रस्त कुटुंबांना मदत करणे , आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत मिळवून देणे हे काम ते सातत्याने करत राहतात.
संदीप जगताप यांचा भुईभोग हा ग्रामीण कविता संग्रह प्रकाशित आहे.या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय काव्य पुरस्कार , संजीवनी खोजे राज्यस्तरीय पुरस्कार, कवी अनंत फंदी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, तिफण लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय पुरस्कार यासारखे 8 राज्यपुरस्कार मिळाले आहे.सामाजिक लढ्यात सतत अग्रहभागी असणाऱ्या संदीप जगताप सारख्या लढाऊ , अभ्यासू , प्रामाणिक व्यक्तीला हा पुरस्कार मिळल्याबद्दल राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर , शेतकरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मी आजपर्यंत शिक्षक म्हणून काम करताना नेहमी सत्यशोधकी विचार राज्यभर पोहचवण्याचे काम केले.केवळ कविता लिहून प्रश्न मिटणार नाही तर शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. हे सत्य समजल्यावर मी शेतकरी चळवळीत सक्रिय झालो.मी ज्या नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत शिक्षक म्हणून काम करतो त्या संस्थेचा विचारांचा पायाच सत्यशोधकी चळवळीचा आहे.या मुळे या संस्थेत काम करण्याचा मला नेहमी अभिमान वाटतो. रोज शाळा सुटल्यानंतरचं माझं आयुष्य मी शेतकऱ्यांना अर्पण करायचं ठरवलंय. म्हणून हे छोटंसं काम माझ्या हातून घडतंय.या मागे आई वडिलांसोबत विविध क्षेत्रातील जेष्ठांचे आशीर्वाद व मित्रांचे प्रेम आहे.
– प्रा.संदीप जगताप



सरजी आपले विचार ऐकून झोपलेलाही जागा होईल…….छान खूपच छान….