भुसावळ : माझा रमणीय प्रवास
खूप दिवसांपासून चालू होते की पोलीस प्रशासकीय सेवेतील बंधू पोलीस उपविभागीय अधिकारी (DYSP) सोमनाथ वाघचौरे
यांच्या बदलीच्या ठिकाणी जावे असे भुसावळ शहर, पूर्वी मनमाड येथील रेल्वे स्टेशन वरील साफसफाईच्या कामामुळे कार्यालयीन कामासाठी भुसावळ DRM ऑफिसला कायम जावे लागायचे त्यामुळे परिचित होतेच. दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी रेल्वे तिकीट आरक्षित करून भुसावळकडे 2 वाजून 35 मिनिटांनी प्रस्थान केले. माझी लाडकी कन्या प्रणाली पहिल्यांदा व पत्नी निवेदिता रेल्वेमध्ये दुसऱ्यांदा बसली होती. या दोघींनाही रेल्वेच्या प्रवासाबद्दल एक वेगळेच आकर्षण होते. कामाच्या निमित्ताने माझे भरपूर फिरणे होते मात्र घरात राबणारी आपली अर्धांगिनी कायमच ‘बिझी’ असते. कौटींबिक भेटीगाठी निमित्ताने हा प्रवास घडत होता. रेल्वेमध्ये गप्पाटप्पा मारत, विनोद मस्करी करत प्रवास चालू होता. समोर सीटवरील सहप्रवासी यांनी प्रणालीला जेलीचे चॉकलेट दिले. सगळ्यांमध्ये मिसळणारी प्रणाली इथही निवडून पडली याचं बाप म्हणून मला कौतुक वाटत राहिलं.
छोट्या प्रणालीचा पहिलाच रेल्वे प्रवास असल्याने सारखी खाली – वर ह्या सीटवरून त्या सीटवर जात होती. ती आनंदात होती. रेल्वेतल्या उपकरणाविषयी माहिती घेत होती. याला बर्थ म्हणतात. पुढे इंजिन असते.
एकावेळी हजारो प्रवासी प्रवास करतात पण रेल्वे कशी स्वच्छ असते याची माहिती मी दिला देत होतो. लघुशंका लागलेली नसताना सुद्धा दोनदा उस्तुकतेपोटी जाऊन आली.
रेल्वे काही कारणास्तव लेट झाली होती. भुसावळ येथे 6 वाजता पोहोचलो. निवेदिताने आमच्या ओवी वहिनींना कॉल आणि मेसेज केलेला असल्याने, पोलीस गाडी आम्हाला घेण्यासाठी आलेली होती. आमची ओळख पटविण्यासाठी पुतण्या अन्वय गाडीत आलेला होता. काही वेळातच “तापी” या आमच्या बंधूंच्या शासकीय बंगल्यावर पोहोचलो सोमनाथ वाघचौरे (म.पो.से) ही पाटी वाचून हायसे वाटले अन उर अभिमानाने भरून आला. त्याचे संघर्षाचे दिवस समोरून तरळून गेले. डोळ्यात आलेलं पाणी अन कंठातला गहिवर लपवत आत गेलो.
फ्रेश होऊन देवाबत्ती केली. चहापाणी घेतला. बंगल्याच्या बाहेर असलेल्या खाटीवर बसून बंगल्याचा एक फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. चहुबाजूने चक्कर मारल्यानंतर अन्वयला म्हटले की पप्पांचे काही पुस्तके आहेत का बघ अन वाचण्यासाठी दे..!!!
त्याने कपाटातून श्रीमद्भगवद्गीता दिली. ती पण इंग्रजी आवृत्ती. सोबत इतरहि पुस्तके होती. त्यातील एक पुस्तक व पुस्तकाचे शीर्षक आवडले. वाचनास सुरुवात केली 15 /20 मिनिटांनी बंधूंचे आगमन झाले. अन पुस्तक तसेच ठेवावे लागले.
फ्रेश वगैरे होऊन आम्ही गप्पा मारल्या. बऱ्याच वैचारिक विषयावर चर्चा झाली, किचन मधून स्वयंपाकाचा छान सुवास येत होता. भूक लागल्याने पोटात कावळे कावकाव करतच होते. बंधूंनी श्रीखंड आणले होते. मटकीची भाजी, शेवयाच्या शेंगांची भाजी, असा मस्त मेनू होता. त्याचबरोबर आईने सोमाभाऊ साठी दिलेली पाटोदा येथील लग्नाची बुंदी होती. जेवणानंतर बंगल्याच्या परिसरातील लॉनवर शतपावली केली बॅडमिंटन खेळलो काही कौटुंबिक,आर्थिक, व्यवसायिक, प्रशासकीय बाबतीत सोमनाथ भाऊसोबत बराच वेळ चिंतन चर्चा झाली. 
आमच्या या ‘बोअरिंग’ चर्चेने सगळे कंटाळले असतील असं उगाच वाटलं. सर्वांना घेऊन ताप्ती क्लब या ठिकाणच्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलो. क्लब मेंबर कर्मचारी घरी जात असताना बंधूंना पाहिले व नमस्कार केला. पुन्हा क्लब उघडला सोमाभाऊ, अन्वयने बॅडमिंटन खेळले. मी प्रणालीला घेऊन तेथील शेजारील गार्डनमध्ये झोका घसरगुंडी सि-सौं खेळण्यासाठी गेलो. बोलता बोलता प्रणाली एक वाक्य बोलली की पोलीस असल्याचा किती फायदा होतो ना. ते अंकल घरी जात असताना सुद्धा परत आले, क्लब उघडण्यासाठी..! तिच्या या वाक्यावर मात्र मी गंभीर झालो. काय बोलावं यावर ? बराच वेळानंतर आम्ही जिम पाहिली व तेथील कर्मचाऱ्याने पूर्ण क्लब दाखवला. व बाहेर पडलो व बराच मोठा चक्कर मारून पुन्हा “तापी” वर पोहोचलो. क्लब मेंबर कर्मचारी हा आमच्या बंधूचा चांगला मित्र होता, त्यामुळे आधीच फोन करून ठेवला असल्याने आम्हाला सगळ बघायला मिळालं. आता प्रणालीने बोललेलं वाक्य आठवले अन मनातून हसू आले.
काही वेळाने बंधू आणि मी बाहेर लॉनवर बसून रात्री साडेअकरा पर्यंत बऱ्याच वैचारिक गप्पा मारल्या. या गप्पा चालू असताना साधारणपणे रात्री साडेदहा वाजता वाकी येथून जिजाबाई कर्डक या आमच्या गावातील एका महिलेचा कॉल आला. बोलता बोलता चर्चा झाली की समाजातील कोणत्याही व्यक्तीचा बिनधास्तपणे आपल्याला कॉल येतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजेच त्यांना आपल्याशी बोलताना आपलेपणा वाटतो ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. रात्री झोपताना सकाळी लवकर उठून भुसावळ स्पोर्ट्स आणि रनर असोसिएशनच्या कार्यक्रमाला जाण्याचा बेत आखला. सकाळी लवकर उठून ग्राउंड वर गेलो व कार्यक्रमात जेवढे जमतील तेवढे व्यायाम केले घरी परतल्यानंतर ‘दिव्य मराठी’वाचण्याचा आनंद घेतला व फ्रेश होऊन पोहे व पपईचा भरपेट नाष्टा केला.
त्यानंतर पंकज गुजराती यांच्याकडून दुपारच्या रेल्वेचे मनमाड पर्यंत टिकीट आरक्षण करून घेतले. कारण भुसावळ ते नाशिक अशा कोणत्याही गाडीत तिकीट अवेलेबल नव्हते. मुक्ताईनगर येथे जाण्याचा मानस होता पण बंधूंना ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमास जायचे होते. 2 वाजून 45 मिनिटांची रेल्वे असल्याने शक्य नव्हते, त्याचप्रमाणे ओवी वहिनी व दीदीची तब्येत ठीक नसल्याने शक्य नव्हते. दुपारी 11.30 च्या दरम्यान आम्ही नहाटा महाविद्यालयात आयोजित जेष्ठ नागरिकांच्या समस्या आरोग्य विषयक माहिती व कायदेशीर माहिती याविषयी हा कार्यक्रम होता. बंधूंनी जेष्ठांना सायबर क्राईम व इतर होणाऱ्या फसवणुकी विषयी माहिती सांगितली. ज्येष्ठांच्या अनेक प्रश्नांची समाधान पूर्वक उत्तरे दिली. कार्यक्रम संपल्यानंतर बंधू सोबत फोटो काढण्यासाठी अगदी सेलेब्रिटी सारखी एकच गर्दी झाली होती. गाडीत बसेपर्यंत जेष्ठ मंडळी समस्या सांगतच होते. घरी आल्यानंतर कौटुंबिक काही वैयक्तिक अडीअडचणी विषयी निवेदिता मी आणि बंधूंसोबत चर्चा केली. त्यात बऱ्याच गोष्टी उलगडल्या गेल्या. फोटो वगैरे काढून ओवी वाहिनींकडून प्रणालीला अनवी च्या वाढदिवसाच्या गिफ्ट मधील एक सुंदर डॉल मिळाली.
निवेदिताचे हळद कुंकू करून साडी देऊन आम्ही निघालो. मी वहिनींना म्हटलो की, मी पण पहिल्यांदा आलो आहे. मला पण ड्रेस पाहिजे. अन सगळे हसू लागले. वातारणातअसलेला मोकळेपणा सगळ्यांनी अनुभवला. पुन्हा एकदा पोलीस गाडीत बसण्याचा योग आला. प्रणालीने मस्त टोपी घालून हातात काठी घेऊन फोटो काढायला सांगित होती. फोटो काढले व रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. लगेच पाच मिनिटात गाडी आली व B5 मध्ये गर्दीतून वाट काढत सीट शोधले. ट्रेनमध्ये उत्तर भारतीयांची जास्त संख्या होती आमच्या आरक्षित सीटवर दोन जण गाढ झोपेत होते त्यांना उठवून आम्ही तिघ जण एका अप्पर सीटवर ऍडजेस्ट झालो व आमच्या एका सीटवर तिघे ऍडजेस्ट झाले. त्यातील एक जण बराच वेळ झाल्यावर बोलला, भैय्या आपको कुछ तकलीफ तो नही है ना. मी नाही म्हटल्यावर त्याने छानशी स्माईल दिली व माझा पूर्ण थकवाच कुठल्या कुठे गायब झाला. सायंकाळी 5:30 वाजता मनमाड स्टेशनवर उतरून पन्नास रुपये मध्ये रेल्वे स्टेशन वरून बस स्टैंड वर आलो साडू शामराव व मोना आलेले होते. सायंकाळी 6 वाजता नांदगाव आगाराची बस नासिक पर्यंत होती सीट मागे मिळाल्यामुळे आदळ -आपट जास्तच होत होती. एक छोटी डुलकी झाली व 07:45 जत्रा हॉटेल परिसर येथे पोहोचलो व घरी आलो. अशी आमची भुसावळची ट्रिप खूप छान व रेल्वेतील गमती जमतीमुळे अविस्मरणीय ठरली.
- जनक दशमन

