आज आपण सत्तेत आहोत. या सत्तेचा उपयोग लोकांची मदत करण्यासाठी प्रयत्न करा – जयंत पाटील
नांदगाव ( राजेंद्र तळेकर) – नांदगाव विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपयश आले मात्र आपला पक्ष जर मजबूत असेल तर असे अनेक पराभव पचवून आपण पुन्हा उठून उभं राहू शकतो. लोकांशी संपर्क साधा पराभवाच्या कारणांची मिमांसा करा. आज आपण सत्तेत आहोत. या सत्तेचा उपयोग लोकांची मदत करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नांदगाव येथे केले.
आपल्याला पक्ष म्हणून आपल्या लोकांपर्यंत पोहोचावेच लागेल. त्यासाठी आपल्याला आपली संघटना सक्षम करावी लागेल. सैन्य नसेल तर लढणार कसे ? त्यामुळे हे सैन्य उभं करावं. हीच लोकं आपल्या विजयाची शिल्पकार ठरणार आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळसाहेबांनी मोठा पाठपुरावा केला आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवून ठेवले. ओबीसी समाजाबद्दल भाजपला तिरस्कार म्हणून ओबीसी आरक्षणात अडथळे निर्माण करण्यात आले.
त्याच तिरस्कारमुळे भुजबळसाहेबांना तुरुंगात टाकण्याचे काम भाजपने केले. न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहात भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र विजय सत्याचा होत असतो म्हणून आज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली व भाजप तोंडघशी पडले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.ओला दुष्काळाबरोबर शेतकऱ्यांना मदत मिळणे जास्त महत्वाचे आहे. सरकार सर्वांना मदत करणार आहे.त्यापध्दतीची पाऊले सरकारने टाकली आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.देशातलं काही सोडायचं नाही सगळं विकायचं धोरण मोदीसरकारने राबवायला सुरुवात केली आहे. मोदी सरकार भांडवलदारांचे आहे हे आता नक्की झाले आहे. हे सगळे मुद्दे मतदारापर्यंत पोचवा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.नांदगाव मतदारसंघ हा पवारसाहेबांवर प्रेम करणारा मतदारसंघ असून इथे आपण मोठ्याप्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने आपला पराभव झाला मात्र आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल माजी आमदार पंकज भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले.पराभवानंतर आता बराच काळ लोटला आहे. आपण पराभवाची मरगळ झटकून येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे.
संघटना आपण मजबूत करू आणि प्रदेशाध्यक्षांना एक चांगला निकाल देऊ असे आश्वासन पंकज भुजबळ यांनी दिले.मागील काळात मोठी अतिवृष्टी झाली. आमच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे आता आम्हाला मदतीची गरज आहे त्यासाठी या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही पंकज भुजबळ यांनी केली.नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.या संवाद यात्रेला मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, माजी आमदार आसिफ शेख,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बाळा कळंजी, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवती जिल्हाध्यक्षा ईश्वरी खैरनार, महिला तालुकाध्यक्षा योगिता पाटील, योगेश गोसावी, दिव्या भोसले आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

