वारी
– जनक देशमन, जेलरोड, नाशिक
मागील महिन्यापासून संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संघर्षमय जीवनावरील कादंबरी ‘सुवर्णपिंपळ’ वाचत आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सण उत्सव म्हणजेच वारी, दिंडी, कीर्तन, हरिनाम याविषयी मला एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले आहे. माझे आजोबा तसे माळकरी, पण त्यांनी वारी केल्याचे मला आठवत तरी नाही. आजी नाथांची भक्त. माझ्या माहितीप्रमाणे आजी ‘मायंबाबा’ या नाथांच्या मंदिरात जायची. त्यामुळे आमच्या घरात पूर्ण धार्मिक वातावरण. वडिलांनी सुद्धा नवनाथ पोथीचे, ज्ञानेश्वरीचे पारायण, तुकोबांच्या गाथेचे पारायण केल्याचे ज्ञात आहे. बरीच भर म्हणून सासरवाडी सुद्धा एकदम कट्टर माळकरी व वारकरी मिळाली. त्यात पत्नी ने लग्ना आधी काही कीर्तने व प्रवचने केल्याचे माहिती आहे.
बऱ्याच दिवसांनी सोमवार (तसा शनिवार व रविवारच्या सुट्टीनंतर) प्रसन्न उगवला. थोडासा कामाचा ताण-तणाव होताच, कारण बऱ्याच लोकांना सोमवारचा वायदा दिलेला असतो. ऑफिसचे सकाळचे काम करून बसलो होतो. घरून निघाल्यानंतर रस्त्यात बऱ्याच दिंडीचे दर्शन झाले होते. मनात सारखा विचार चालू होता की, त्र्यंबकेश्वरला जाऊन यावे. निलेश दादा उगले व पंकज भाऊ सोनार यांना या बाबत विचारले, पण ते व्यस्त असल्याने त्यांना येणे शक्य नव्हते. मग निवेदिताला (बायकोला) घरूनच गाडी घेऊन बोलावले व गाडीवर आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो. वाकी व मुरमी (ता.येवला) चे ‘नानाबाबा’ ज्या तुकारामबाबांच्या दिंडीत सहभागी होत त्या दिंडीकडे लक्ष होतंच. मजल दरमजल करत दिंड्या बघत बघत त्र्यंबक जवळ आले, तसा घरचा सगळा ताण तणाव इतर समस्या घरी सोडून आल्याचा भास झाला. वारकरी, ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा जयघोष करत भजन म्हणत होते. भगव्या पताका, झेंडे , टाळ, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते. काही वारकरी माइकवर भजन म्हणत होते, काही जण थकल्यामुळे ट्रॅक्टर पिकप व इतर वाहनांमधून प्रवास करत होते.
आम्ही एक वारकरी असा पाहिला की जो एकटा आणि अनवाणी पायाने चालत होता काही महिला वारकरी ग्रुप ग्रुपने ‘चावळत-बोलत’ चालल्या होत्या. काही वारकरी झाडाच्या सावलीखाली थांबून भजनाच्या आवाजात नाचत होत्या होते. काही जण ठेप्याच्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत होते. काही आराम करत होते. जिकडे तिकडे सगळीकडे भक्तीमय वातावरण होते. त्र्यंबकेश्वरची वारी म्हणजे श्री निवृत्तीनाथांची म्हणजेच श्री ज्ञानोबारायांचे मोठे बंधू व गुरु यांच्या संजीवन समाधी स्थानाला जाणारी वारी होय.
ब्रह्मगिरीच्या याच परिसरात नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली तेच हे ठिकाण. ब्रह्मगिरी पर्वतावर गहिनीनाथांचे मंदिर आहे. आम्ही श्री निवृत्तीनाथांचे बाहेरून दर्शन घेतले व वडापाव व डाळ वडाचा नाश्ता करून परतीचा प्रवास चालू केला. वाटेत येता जाता नाना बाबांच्या ठेप्याच्या ठिकाणी ‘खांबाळे फाट्यावर’ पोहोचलो. त्या ठिकाणी नुकताच महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपला होता. आम्ही पोहोचताच ‘वाल्मीकभाऊ गीते’ यांनी महाप्रसाद घेण्याचा आग्रह केला. आम्ही महाप्रसाद कृष्णार्पण केला.
अन जोरदार जयघोष केला
“पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
राम कृष्ण हरी”
जेवणानंतर नानाबाबा सोबत गप्पा मारल्या, छान पैकी फोटो काढून त्यांचा निरोप घेतला.
वारी ही एक सामाजिक शक्ती आहे कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही. कोणीही बोलावत नाही, कुणाला आमंत्रण नाही, तरीपण सर्व सुरळीत पार पडते. म्हणून मी म्हणतो एकदा तरी वारी अनुभवावी.
– जनक देशमन, जेलरोड, नाशिक
+91 98501 48811

