जैविक बीजप्रक्रिया करून बियाणे पेरणी करण्याचे आवाहन
चालू खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीपूर्वी जैविक बीजप्रक्रिया करण्यासाठी गावागावात प्रात्यक्षिकांद्वारे मोहीम राबविण्यात येत असून शेतकरी बांधवांनी जैविक बीजप्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
तालुक्यातील गावागावात ट्रायकोडर्मा, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी आदी जैविक जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.यामध्ये जैविक बीजप्रक्रियेचे महत्व सांगण्यात येत आहे.जैविक बीजप्रक्रिया केल्याने रासायनिक खतांची बचत होते,तसेच पिकांना नत्र,स्फुरदची उपलब्धता होते.बियाण्यांची उगवण क्षमता वाढून बीज अंकुरण जास्त प्रमाणात होते,बियाणांवरील रोग पसरविणाऱ्या बुरशींची वाढ होऊ न देता जमिनीतच रोगकारक बुरशीचा नायनाट होतो,पिकांची जमिनीतील अन्नद्रव्य खेचून घेण्याची क्षमता वाढते,झाडांची मुळे जोमाने वाढतात,परिणामी उत्पादनात वाढ होते.पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी जैविक बीजप्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिवाणू संवर्धकांची किंमत रासायनिक खतांच्या किमतीच्या तुलनेत अतिशय कमी असून उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. जैविक बीजप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक अथवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
– विलास सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,चांदवड

