[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रेशनदुकानदार करत असलेली सक्ती मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना युवक राष्ट्रवादी चे पत्र

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

रेशन दुकानावर तिरंगा विकत घेण्याची सक्ती करू नये

नाशिक (दि.१२ ऑगस्ट २०२२) – “हर घर तिरंगा” मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरावर लावण्याकरिता तिरंगा विकत घ्यावा, अशी सक्ती रेशनदुकानदार करत असल्याने ही सक्ती मागे घ्यावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांना दिले आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून, “हर घर तिरंगा” या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने नाशिककर आपल्या घरावर तसेच वाहनांवर तिरंगा लावताना दिसत आहे. परंतु गोर-गरिबांसाठी धान्य मिळणाऱ्या रेशनदुकानांवर दुकानदार त्यांच्याकडून तिरंगा विकत घेण्याची सक्ती करत असल्याने नागरिक विरोध करत आहे. दारिद्र रेषेखालील जनतेला रास्त भावात धान्य मिळावे याकरिता रेशन दुकानात धान्य वितरण होत असते. सदरचे धान्य विकत घेण्यासाठी गोर-गरीब काबाड कष्ट करून आपल्या झोपडीत राहतात. त्यांच्याकडे स्वतःचे घर नसल्याने त्यांना तिरंगा विकत घेवून लावावा तरी कुठे असा प्रश्न त्यांना उद्भवत आहे. रेशन दुकानदार करत असलेली सक्ती तातडीने थांबविण्याचे संबधितांना आदेशान्वित करावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

अंबादास खैरे

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घोषणा करून देखील अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाही. गरिबांकडे घरे नसल्याने ते तिरंगा लावणार कुठे ?
-अंबादास खैरे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या